Monday, April 15, 2019

उत्तेजन आणि प्रक्षोभक विधाने

उत्तेजन हे प्रक्षोभक विधानांना जन्म देते आणि प्रक्षोभक विधाने हि वाचणाऱ्यांना किंवा ऐकणाऱ्यांना उत्तेजित करतात. पुन्हा तशीच विधाने, उत्तरे, प्रतिप्रश्न होतात. एक चक्र सुरु होते जे विषयाभोवती फिरत राहते पण त्याचा गाभा गाठत नाही. परिक्रमा चालू असल्याने त्यात भाग घेणाऱ्यांना असे वाटते कि आपण पुढे जात आहोत पण मुळात ते व्यासाभोवातीच फिरत असतात.

आजमितीला उत्तेजानपूर्ण वक्तव्ये आणि विधाने ही राजकारण प्रेरित असतात आणि विष पेरीत असतात. त्यामुळे काही काळासाठी का होईना पण समाज अस्थिर होऊन आपापसात कलह निर्माण करतो आणि त्याचा राजकीय फायदा घेतला जातो. ही अस्थिरता पुढे बऱ्याच प्रश्नांना जन्म देते आणि सुप्त रुपाने लोकांच्या मनात घर करून राहते. त्यामुळे थोडे कोणी काही उलट बोलले कि त्याचे उलट आणि दीर्घकालीन परिणाम दिसून येतात.

सुधारक वक्तव्यांना प्रक्षोभक असण्याची आवश्यकता नसते. आपले विचार किती प्रगल्भ आहेत यावर लोक तुमचे किती ऐकायचे हे ठरवतात. आपण जर इतिहास पहिला तर लक्षात येईल कि ज्या लोकांनी समाज सुधारणा केली ते उत्तेजित होत नसत. सखोल पाणी हे तितकेच शिथिल असते. कितीही नद्या सागरात मिळाल्या तरी अखंड सागर उसळत नाही. त्याला जेव्हा गरज असते तेव्हाच तो भरती किंवा ओहोटी घेत असतो.

कोणतीही चर्चा किंवा मंथन करताना शांत वातावरण आणि शांत मनःस्थिती दोन्हीही आवश्यक असतात. तिथे उत्तेजित होऊन विधाने मांडली कि ती चुकण्याची शक्यता दाट असते त्यामुळे पुढे चर्चेचे रुपांतर गोंधळात होते आणि हाती काहीही लागत नाही. संसदेतील गोंधळही कदाचित आपल्या मागे राहण्याला कारण असेल. शांतपणे आणि विचारपूर्वक मांडलेले विषय अथवा उत्तरे लोक वाचतात आणि प्रतिक्रिया देतात. आणि निश्चितच विषय पुढे सरकू शकतो, निर्णायक ठरू शकतो अथवा एक पैलू तरी उलगडतो.

No comments:

Post a Comment